Pages

Sunday, 30 October 2022

कार्पोरेट : राजकारणातून धर्मकारणाकडे



१९९९ नंतर देशात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. परदेशी गुंतवणूक वाढ लागली. उद्योगांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. कामाचे स्वरूप बदलले.सरकारी नोकरीपेक्षा खासगी नोकरी बक्कल पॅकेज मिळू लागले. खासगी नोकरी म्हणजे दामदुप्पट योजना वाटू लागली. नव्या शब्दात सांगायचे तर कॉर्पोरेट युग सुरू झाले. कार्पोरेटची चकाचक दुनिया पाहून सरकारी नोकरही भाळले. काहींनी नोकऱ्या सोडल्या. चकाचक जगणे सुरू झाले. हा बदल सर्वस्तरावर झाला. कधी नव्हे एवढा पैसा घरी यायला लागला. यातून कौटुंबिक भान हरपले. त्यानंतर सामाजिक भान. आता प्रत्येकजण कार्पोरेटचा विचार करीत आहेत. दोन खोल्यांचेही ऑफिसही आता कार्पोरटसारखे वाटू लागले. या एका शब्दामुळे जगच बदलले.  कार्पोरेट विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. हा बदल अपेक्षित होता. पण सामाजिक व्यवस्थाच उद्धवस्त करेल, असे वाटले नव्हते. सध्या सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्था टिकवून ठेवणे आवश्यक आहे. या दोन्ही अवस्थेचा विपरीत परिणाम धर्मावर होत आहे. राजकारण आणि धर्मकारण एकत्र करणे सुरू झाले. पैशाच्या जोरावर हे सर्व सुरू आहे. याला परिणामाला २०१४ पासून प्रचंड वेग आला. सामाजिक, राजकारण आणि धर्मकारणात शिरकाव झाला. त्यांचे परिणाम पुढे येत आहेत. कार्पोरेट हे नाव गोंडस आणि लुसलुसित वाटत असले तरी या शब्दाने अनेकांचा बळी घेतला आहे. प्रचंड पैसा आला. आर्थिक नियोजन बिघडते. अनावश्यक खर्चांना अगदी महत्त्व दिल्या जाते. यातून अनेक अनावश्यक सवयी लागल्या. या सवयी लागल्या की सुटत नाही. यातून नोकरी टिकविण्यासाठी मन वाट्टेल ते करायला भाग पाडले जाते. बहुतांशवेळा ते नाइलाजास्तव स्वीकारावे लागते. १५ तास काम करूनही कार्पोरेट भस्मासुराची भूक भागत नाही. शेवटी माणूसच तो थकतो. परर्फोमन्स नाही म्हणून नोकरी जाते. वाढलेले खर्च सवयीमुळे कमी करता येत नाही. यातून कुटुंब कलह होते. शेवटी नैराश्य येते आणि आत्मघाती निर्णय घेतले जातात. ते मनाला पटले किंवा नाही पटले तरी, वैचारिक अवस्थेतही हाच प्रकार सर्वत्र दिसून येतो. 

वरील प्रकार नोकरीपूरता मर्यादित नाही हे लक्षात ठेवावे. वर सांगितल्याप्रमाणे याचा परिणाम कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आणि धर्मकारणावर झाला. कारण या चारही अवस्थेत केंद्रस्थानी माणूसच आहे. म्हणून एका कलहातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या आणि तिसऱ्यातून चौथ्या कलहात माणूस फसत जातो. त्यांचे माणूसपणही हिरावले जाते. कौटुंबिक आणि सामाजिक कलहातून मनुष्य रसातळाला गेल्यानंतर राजकारण आणि धर्मकारणात स्वतःला टिकविण्याचा प्रयत्न करतो. राजकारणाला कार्पोरेट प्रकार भयंकर आहे. २०१४ पासून त्याने आक्राळविक्राळरुप धारण केले आहे. समाजातील नेत्याला पदे देणे. त्याला त्याची चटक लावणे. आणि त्या पदाशिवाय जगू शकत नाही एवढे त्याला व्यसनी करणे. धूर्त राजकारणी आणि पक्ष एखाद्या समाजात दुही निर्माण करायची राहिली तर त्याला व्यसनी बनवतात. नेत्यांना पदे आणि कार्यकर्त्यांच्या घराशेजारी दारूचे गुंते सुरू करतात. यातून त्यांचा हवा तसा उपयोग करून समाजाला नेहमीच दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जातो. राजकारणात खऱ्या अर्थाने कार्पोरेट राजकारण भाजपने आणले. प्रचंड पैसा असल्याने त्यांनी प्रत्येक समाजातील एखाद्या नेत्याला एवढे मोठे केले की राजकारणाशिवाय तो राहू शकत नाही. आणि पद टिकविण्यासाठी असे पक्ष इतिहासातील खरेही किती खोटे होते हे त्यांच्या मुखातून सांगून मोकळे होतात. योग्य ती संधी मिळाली ही अशा पोपटांना जाहीर बोलायला लावून समाजाची दिशाभूल करायला लावतात. सध्या बौद्ध समाजात अनेक महारथी निर्माण झाले आहेत. त्यांचा समाचार नंतर घेऊ. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रपरिषदेत मोठे विधान केले. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धधम्म अनिच्छेने घेतल्याचे सांगितले. अनेक वृत्तवाहिन्यांवर त्यांचे विधान ठळक सांगितले गेले. सामाजिक माध्यमांवरही तेच झळकले. नंतर रामदास आठवले यांच्याकडून विपर्यास केल्याचा खुलासा करण्यात आला. तोपर्यंत बरेच पाणी वाहून गेले. सध्याच्या सरकारला खूष करण्याचे सर्व प्रयत्न होत आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येलाच असे वक्तव्य करणे  या राजकारण्यांना कसे सुचते हा संशोधनाचा विषय आहे. रामदास आठवले यांनी सरकार आणि संघटनेला दिलेला शब्द पाळला,अशी माध्यमात चर्चा आहे. विपर्यास वगैरे हा नंतरचा मुलायमा आहे. धम्मासारख्या संवेदनशील विषयांवर असे हा घडते. या मागे अनेक कंगोरे असू शकतात. मात्र, मूळ हेतू बघितला तर असे लक्षात येईल हे वर म्हटल्याप्रमाणे हे राजकारणी कार्पोरेट झाले. मोठे  पदे मिळाली. सन्मान मिळाला. ऐषआराम मिळत आहे. सरकारी अधिकारी दिमलीच आहेतच. लोकांतून निवडून न येताही ही किमया नेते करीत आहेत.

 समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे म्हणून नाही तर भाजपसारख्या पक्षाला बौद्ध आणि आंबेडकरवादी समाजात वाट्टेल तेव्हा फूट पाडता यावी म्हणून.  समाजातील अनेक नेते दावणीला बांधले आहेत. भाजप आणि त्यांच्या संघटनांचे हे हुकूमांचे पत्ते असतात. बौद्ध समाजातील अनेक पत्ते भाजपच्या खात्यावर आहेत. प्रत्येक समाजात त्यांनी अशा नेत्यांची निर्मिती केली आहे. आठवले असे हा बोलले यावर समाजाने चिंतन करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात हिंदू राष्ट्राची घोषणा होण्याची शक्यता आहे. करणार किंवा नाही हा वादांती विषय आहे. पण, त्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक धर्म हे हिंदू धर्मातून वेगळे झाले. त्यामुळे ते सर्व धर्मच हिंदू धर्माचा भाग आहेत हे सांगून हिंदू राष्ट्राची संकल्पना अस्तित्वात येऊ शकते. यातून आठवले बोलले असावे. त्यावर समाजातील धुरिणांनी विरोध केला. त्यानंतर हे खोटे आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आठवलेंच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. 

पण, ते असे का बोलले तर त्यामागे कार्पोरेट जगण्याचा आधार आहेत. पद, प्रतिष्ठा आणि पैसा हातून जाऊ नये. या गोष्टी गेल्या की समाज ढुंकूनही पहात नाही. कार्पोरेटमध्ये लागलेल्या सवयी सोडणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे असते. आणि असे होऊ नये याकरिता हा खटाटोप आहे. धम्मचक्र प्रवर्नतदिनी असे जाहीर करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. हजारो वर्षे गुलामीत राहिलेल्या समाजातील काहींना कार्पोरेटची सवय झाली आहे. ऐषआराम सोडण्याची त्यांची मुळीच इच्छा नाही. राजकारणात स्वबळावर समाजाचे अस्तित्व नाही. भविष्यात काही मिळेल, असे दूरदूर चित्र नाही. बौद्ध धम्म ही सर्वच समाजाचा वीक पाइंट आहे. जागतिक पातळीवर भारताची ओळख बुद्धांचा देश म्हणून आहे. बुद्ध आधीही इतरांसाठी धोकादायक होता. आताही आहे आणि पुढेही राहील. बौद्ध धम्मात विज्ञान आहे. मेंदूला विचार करण्याची ताकद देणारे विचार आहेत. बुद्धाला संपविण्याचा प्रयत्न प्रत्येक युगात झाला. पण बुद्ध संपला नाही. अशोक सम्राटांनी ८० हजार स्तुपातून जिवंत केला. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती करून बुद्धाचे नवे रुप जगाला दाखविले. बुद्धाला अनेकांनी सोयीप्रमाणे घेतले. सोयीप्रमाणे सांगितले. बुद्ध विस्कळित झाला. पण बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध अनेकांना पचनी पडला नाही. याचाच धोका प्रस्थापितांना वाटतो. बाबासाहेबांनी बुद्ध सांगून सनातन्यांची बोलती बंद केली. म्हणूनच आठवले म्हणतात, बाबासाहेबांनी अनिच्छेने बुद्ध धम्म स्वीकारला. बौद्ध धम्म का स्वीकाराला हे बाबासाहेबांनी पानोपानी लिहून ठेवले आहे. ते सांगण्याची गरज नाही. येवले येथील परिषदेत १३ ऑक्टोंबर १९३५ रोजी घोषणा केली. तब्बल २० वर्षे त्यांनी हिंदू धर्मात राहून सुधारणेची अपेक्षा केली. दरम्यान त्यांनी वेळोवेळी बुद्धधम्म सांगितला. त्यांनी बौद्धधम्म अनिच्छेने कधीही स्वीकारला नाही. अनेक धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. हा धम्म अनेकांच्या गळ्यात अडकत आहे. गुलामीचे साखळदंड तुटू पाहत आहेत. लोक प्रश्न विचारायला लागले. प्रस्थापितांना हेच नको आहे. प्रश्न विचारणे सुरू झाले की गुलामगिरी नष्ट होते. हुकुमशाहांना हे मान्य नाही. सनातनी आपला धर्म वाचविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. यातील कार्पोरेट हा प्रयोग आहे.

विरोधकांना विचार करण्याची संधीच देऊ नये, याकरिता आमिषाचे प्रबळ प्रलोभन देणे सुरू आहे. वाममार्गाला लावून त्यांना समाजात फूट पाडून दिशाहीन करण्याचा हा प्रयोग आहे. तो बऱ्यांशी यशस्वी होत आहे. इथेच कार्पोरेट जिंकतो. धर्मात कार्पोरेट आल्याने मंती गुंग होते. दुसरे काही दिसत नाही. अय्याशीचे जीवन हे त्यांचे साध्य असते. राजेमहाराजे असताना असेच प्रकार व्हायचे. आता त्याचे स्वरूप बदलले आहे. यामुळे दिशाभूल करणारे वक्तव्य करून समाजात कायम दुही निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या तरी यशस्वी होत आहे.

दिल्लीतील घटना अगदी वेगळी आहे. एक पदासाठी धम्माला सनातन्यांच्या दावणीला बांधतो. तर दुसरा धम्मासाठी पदाला लात मारतो. दिल्लातील एका कार्यक्रमात १० हजारांवर लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला. आपचे दिल्लीचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत धम्म सोहळा झाला. २२ प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेबांनी नागपूर येथील धम्मदीक्षा सोहळ्यात या २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. गेल्या ६६ वर्षांपासून अनेक कार्यक्रमात २२ प्रतिज्ञा घेतल्या जातात. दिल्लीत मात्र, यावर वाद होतो. आपचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांना राजीनामा द्यावा लागतो.एकीकडे धम्माचे आचरण करून पदाला लाथ मारली जाते. तर दुसरीकडे धम्माला दूर सारून पद टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. बुद्धांच्या शिकवणीतील ‘वासना’ त्यागण्यास तयार नाही. वासनेचे दुसरे आधुनिक रुप कार्पोरेट आहे. वासना कधी संपत नाही. तसेच कार्पोरेटचा हव्यास कधी संपत नाही. वासना समजून घेणे सोपे नाही. मात्र, कठीणही नाही. सम्यक मार्गाने जिवन आचरता येते. पण, बुद्धाचा सम्यक मार्गही आता शोधावा लागतो. त्याआधी सम्यक आचरण आवश्यक आहे. आचरण आणि विचारच सम्यक नसल्याने वासना हावी होत आहे. यातून सुटका करायची असेल तर मोह, मायातून स्वतःची सुटका करा. सम्यक आचरण ही बुद्धाची शिकवण आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मार्ग कठीण आहे. तो अशक्य नाही.

-चंद्रशेखर रामदास महाजन
प्लॉट क्र. ५९, जनसेवा हाउसिंग सोसायटी,
भारत गोडावूनच्या मागे, नीलकमलनगर,
नरसाळा रोड, नागपूर.
मो. ९८५०२०९७१० 

1 comment: