Pages

Monday, 2 March 2015

म्हणून शेतकरी मेला, शेतकरी मेला

म्हणून शेतकरी मेला, शेतकरी मेला


चार दिवसांपूर्वी बाबा म्हणजे माझे वडील गावावरून परतले. गावात शेती आहे. ती पाहण्यासाठी नेहमीच अधून-मधून गावाकडे जातात. चार दिवसांपूर्वी ते परतले. सायंकाळाची वेळ होती. मी घरीच होतो. शेती कशी आहे, सहज विचारले. आमच्या शेतात काही नाही. पेरणीची संधीच मिळाली नाही. यामुळे आपल्या शेतात काय आहे, हे विचारण्याची हिंमत झाली नाही. म्हणून मी शेती कशी आहे, हे विचारले. शेतक-यांचे हाल आहेत, यावर त्यांचे उत्तर मिळाले. सिंचन नसल्यामुळे सर्वांचे पिके गेली. काहींच्या शेतात फक्‍त गहू आणि हरभरा आहे. तो सुध्दा आभाळ येत असल्याने वाळून जाईल, असे काळजीपूर्वक बाबा सांगत होते. तसाही मी शेतीकडे फारसं लक्ष देत नाही. यामुळे पुन्हा चर्चा केली नाही. शनिवारी पाउस झाला. काही कामानिमित्त कार्यालयातून सुटी घेतली. सायंकाळी घरीच होतो. शेतीचे काय होईल, म्हणून बाबांना विचारले. पुन्हा शेतकरी मेला म्हणून बाबाने चिंता व्यक्‍त केली. गहू, हरभरा आणि इतर पिके काही दिवसात कापायला येणार होती. आता दोन दिवस पाउस झाला. वा-यासह पाउस झाला. शेतातील पूर्ण पिके झोपली.
गव्हाची कंबर मोडली. हरभरा जमिनीवर पसरला. शेतक-यांच्या मयतीसाठी पुन्हा नवीन कारण मिळाले. हे कारण दरवर्षीच असते. मात्र, मृत्यूचा नवीन सापडा घेवून पाउस येतो. सोयाबीन होत नाही म्हणून शेतकरी धान शेती करायला लागले. काही शेतकरी कपाशी घ्यायला लागले. गेली अनेक वर्षे सोयाबीनचे पीक घेवू-घेवू जमिनीची पोत बिघडली. एकेकाळी एकरी दहा पोते सोयबीन होणारे पीक त्यातून आता दोन पोते निघत नाही. माझे गाव पवनी तालुक्‍यातील निलज. चार एकर शेती आहे. 14 वर्षांपूर्वी शेतात सरकारी अनुदानातून विहिरी खोदली. पण, विहिरीला पाणी नाही. उन्हाळयात विहीर कोरडी. पावसाळ्‌यात म्हणजे, दिवाळी पर्यंत विहिरीला पाणी. यामुळे धानशेती घ्यावयाचे ठरविले. आम्ही लहान असताना वडील ज्वारी, मिरची आणि इतर पिके घेत. यातून पैसा कमी मिळायचा. मात्र, कुटूंबाला दोन वेळची भाकर मिळायची. नंतर सोयाबीन प्रकार आला. सुरूवातीला काळा सोयाबीन होता. त्याचा दाणा अंत्यत बारीक होता. काही वर्षे या काळ्‌या सोयाबीनचे पीक घेतले. चारशे ते पाचशे रूपये क्‍विंटल, असा भाव होता.
सुरूवातील कमी पेरा होता. पोटासाठी भाकर पाहिजे म्हणून वडील सोयाबीन कमी पेरायचे. मात्र, माझ्‌या मोठ्‌या बहिणीचे लग्न करावयाचे असल्याने पैशासाठी सोयाबीनचा पेरा वाढविला. सुरूवातीला तीन वर्षे चांगले उत्पन्न झाले. रोकड हातात येत असल्याने वडिलांचा हुरूप वाढला. काबाळकष्ट करून दहा हजार रूपये जमा केले.
1994 मध्ये बहिणींच लग्न झालं. 13 हजार रूपये लग्नाला खर्च आला. तीन हजार रूपये कर्ज घेतलं. त्यावेळी तीन आणि पाच रूपये दहामहा, असे सावकारी व्याज होते. वडिलांचे नातेवाईक गरीब असल्याने त्यांना कोणी मदत केली नाही. शेवटी गावातील दोघांकडून पाच रूपये दरमहा व्याजाने कर्ज घेतले. बहिणींचे लग्न झाले. धुमधडाक्‍यात नाही. मात्र, व्यवस्थित झाले. मी लहान होतो. मला यातील फारसे समजत नव्हते. बहिणींच्या लग्नाच्या दिवशी जवळच्या आजोबाच्या घरी झोपलो होतो. बहीण सासरी गेली ते सकाळी कळले. रात्री आम्ही जेवणंच केलं नव्हतं. लहान भावाला घेवून झोपले होतो. वडिलांना भाउ नसल्यामुळे लग्नाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. तीन हजारांचे कर्ज घेवून बहिणीचं लग्न झालं. मोठा भार उतरल्याचे वडील लोकांना सांगत आणि लोकही त्याला दुजोरा देतं. एप्रिल महिन्यात लग्न झाल्यानंतर वडील शेतीच्या कामाला लागले. जून महिना आला. घरी काळ्‌या सोयाबीनंच बियाणं ठेवलं होतं. पूर्वी बियाणे ठेवण्याची प्रथाच होती. संकरित बियाणे घेण्याची हिंमत नव्हती. चार एकर शेती कसली. तीन ठिकाणी शेती आहे. अडीज एकराच्या पट्‌टयामध्ये वडिलाने मशागत केली. तीन हजाराचे कर्ज फेडायचे म्हणून वडील तयारीला लागले. घरची बैलजोडी आणि इतर शेतीप्रयोगी साहित्य होते. जून महिना लागला. शेतीची मशागत झाली. काळ्‌या सोयाबीनची पेरणी झाली. वडील खुश होते. फक्‍त तीन हजार रूपयांचे टेन्शन होतं. आम्ही तिघं भाउ. मी मजवा. आम्ही लहान असल्यामुळे शिक्षणाचा खर्च कमी होता. दोन वर्षांतून एकदा कपडे मिळायचे. प्रत्येकाला एक वर्षानंतर. आजोळ किंवा आत्याकडून कपडे मिळायची सोय नव्हती. त्यांचंही कुटूंब गावातच होतं. 12 व्या वर्गापर्यंत पायात चप्पल नव्हती. बहिणीच लग्न झालं. तेव्हा मी नवव्या वर्गात होतो. आदल्या वर्षी माझा अपघात झाला. माझा एक पाय तुटला होता. नागपुरच्या मेडिकलमध्ये नेवून तो जोडला. मी ब-यापैकी चालायला होतो. गावाहून पाच किमी अंतरावर असलेल्या भिवापूरच्या शाळेत जाण्यासाठी तयार होतो. पाच किलोमीटर अंतर पाय तुडवत बिना चप्पलाने जावे लागे. दहापैकी दोघांकडे चप्पला राहायच्या. यामुळं वाईट नव्हतं वाटतं. पेरणी झाली. कर्जफेडीसाठी संपूर्ण शेतात वडिलाने काळा सोयाबीन पेरला. आता तो हवेला लागला होता. वडील खुश होते. कर्ज फेडणा-यांना दिवाळाचा टाईम दिला होता. काळा सोयबीन विकला की, कर्ज फेडायचं. आणि पुन्हा शेतात कुटूंबासाठी गहू किंवा इतर काही पेरायचं, असा वडिलांचा विचार होता. शाळेतून आल्यानंतर ब-याचदा शेतात जावे लागे. तसाही मला शेतीत इंटरेस्ट नव्हता. यामुळे ब-याच वेळा मी जात नसे. तेव्हा वडील दोन शिव्या देवून गप्प बसत. पेरणी केलेलं रोपटं आता हवेला लागत होतं. काही दिवसांमध्ये फुलावर येवून शेंगा लागणार होत्या. पाउस चांगला झाला. वडील रोज शेतात जायचे. त्या शेतातील काही भागामध्ये मिरचीची लागवड केली होती. त्याची निगा राखण्यासाठी ते रोजच शेतात जायचे. जर दुसरीकडे मजुरी मिळाली तर ते दुस-याच्या शेतात कामाला जायचे. आता सोयाबीनला शेंगा लागल्या होत्या. काही दिवसांमध्ये सोयाबीन कापणीला येणार होता. दिवाळी तोंडावर होती. दिवाळी साजरी करण्यासाठी सोयाबीन विकून पैसे मिळतील म्हणून आम्ही खुश होतो. दोन रूपयांचे फटाके मिळाले की, आमची दिवाळी साजरी व्हायची. दिवाळी तोंडावर होती. सोयाबीनची आठ दिवसांत कापणी करू म्हणून वडिलाने आईला सांगीतलं. दोन बायांना कापणीला सांग म्हटलं होतं. आईने कदाचित दोन बायांना सांगीतलं होतं. आठ दिवसांदरम्यान पाउस आला. दिवस नक्‍की आठवतं नाही. प्रचंड पाउस होता. कालपरवा उन्हाळयासारख तापलं होतं. आता गारपीटीचा पाउस झाला. अचानक सर्व काही बदललं. दुस-या दिवशी शेतात गेल्यावर संपूर्ण देश काळ झालं होतं. काळ्‌या सोयाबीनची शेंगा फुटल्या होत्या. दाणे जागोजागी पडले होते. ओंजळीत यावे ऐवढे दाणे जमिनीवर पडले होते. शेतातील पीक पाहून वडील घाबरले. लहान होतो.नवव्या वर्गात होतो. चेह-यांवरील हावभाव कळतं होते. तीन हजारांचं कर्ज वडिलांवर होते, हे आम्हाला माहीत होतं. वडील घाबरले. शेतातील दाणे वेचण्याचे काम आम्ही सर्व करीत होतो. वडील खचले होते. आई त्यांना धीर देत होती. व्याज देवून नंतर पुढच्या वर्षी मुद्‌दल देवू, असे सांगत होती. यानंतर सतत सात वर्षे दुष्काळ झाला. लोकांसाठी नसेलं. पण, आमच्या शेतात पिकचं झालेच नाही. जे झालं ते फक्‍त पोटापुरत. मातीचे काम करून वडिलाने लोकांच कर्ज फेडलं. तीन हजार रूपयांचे कर्ज साडेपाच हजार झालं. त्यापेक्षा अधिक असलं. सात वर्षे आमचे हाल झाले. खायची सोय नव्हती. ज्वारी शेतात व्हायची. तांदळाच्या कण्या बाजारातून एक किलो, दोन किलो आणून पोट भरत होतो. ती सात वर्षे आम्ही भयंकर काढली. दोघा भावाचे शिक्षण राहीलं. दहावीत 59 टक्‍के गुण घेवूनही पुढं शिक्षण घेताना दमछाक झाली. पैसे नव्हते. कॉलेजमध्ये बिना चप्पलाने गेलो. सर्व सहकारी बुट घालून यायाचे. बाजारातील जुनां फुलपॅन्ट घेतला. घरी नेवून कंबरेत बसेल ऐवढं त्याला फिट केलं. 11 व्या वर्गात भिवापूर महाविद्यालयात शिक्षण घेतलं. पुस्तक नव्हती. दोन रजिस्टरवर 11 वी काढली. वडील खचून गेले होते. पैसे नाही. शेतात पीक नाही. तेव्हापासून शेतही सावरले नाही आणि वडिलही. 2000 वर्षे उजाळलं. आम्ही मोठे झालो. घरी मदत करायला लागलो. तेव्हा कुठं घर रस्त्यावर आलं.
ही स्थिती शनिवारी झालेल्या पावसाने प्रत्येक शेक-यांची झाली. अनेक शेतक-यांच्या आशा-आकांक्षा यातून पाण्यात मिळाल्या. शेतातील पीक गेले की शेतकरी हतबल होतो. त्यांना कर्ज देणाराही त्याला तुच्छ नजरेने पाहतो. हे सर्व मी माझ्‌या घरी माझ्‌या वडिलासोबत घडलं म्हणून सांगतो. शेतकरी केव्हाच मेला. शेतकरी जगतो कसा हे मलाही समजलं नाही. वडिलांनी कर्ज फेडलं तेव्हा हायसं वाटलं. मोठ्‌या कर्जातून मुक्‍त झाल्याचं त्यांना वाटत होतं. आम्ही हातभार लावित असल्यामुळे त्यांच्या डोक्‍यावरचं टेन्शन कमी झालं. मात्र, कालच्या पावसाने अनेक शेतक-यांचे टेंन्शन वाटल. शेती फायद्याची नाही. ती कधीच फायद्याची नव्हतीच. फक्‍त जनावरांसारख पोट भरत होती. मात्र, त्यातही शेतक-यांचा स्वाभीमान जागा होता. हक्‍कांचा तो फक्‍त स्वाभीमान होता. मात्र, गेल्या काही वर्षांत तो डगमगला. शेतकरी आत्महत्या करू लागला. त्यावेळीची भयावह परिस्थिती माझ्‌या डोळ्‌यासमोर आली की, कदाचित बाबांनी सुध्दा आत्महत्या केली असती. त्यावेळी मात्र, आत्महत्या करणारे शेतकरी नव्हते. तसेच त्याचे लोण सुध्दा सर्वत्र नव्हते. आता शेतकरी सरसकट आत्महत्या करीत आहे. डोक्‍यावरचा भार कमी करण्याऐवजी तो स्वतःचाच भार कमी करीत आहे. शेतकरी मरत आहे. तो कधीचाच मेला. तरी तो पुन्हा मरत आहे. त्याच्यातील जिवंतपणा मरत आहे. त्याच शरीर मरत आहे. शेतीमध्ये काही नवीन करतो, असे शेतक-याला वाटत असलं तरी पैशासमोर त्याचं काहीएैक चालत नाही. पैसा नाही. बॅंका कर्ज देत नाही. सावकारही आता दारांत उभं करत नाही. सरकारचा फेरा नको म्हणून हक्‍काचा सावकारही दूर झाला आहे. गावात भयंकर वाईट परिस्थिती आहे. मजूर सुखी आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पूर्व विदर्भात शेतकरी आत्महत्येचे लोण नव्हतं. मात्र, ते आता आमच्या गावापर्यंत पोहोचलं. गावात कोणी आत्महत्या केली नाही. मात्र, करणार नाही, याची शाश्‍वती नाही. शेतीला फार वाईट दिवस आले, असे म्हणण्यापेक्षा शेतक-याला वाईट दिवस आले. शेतीचे भाव वाढले. 5 लाख रूपये एकर शेतीचे भाव झाले. मात्र, शेतक-याचे भाव घसरले. शेती विकून कुटूंबाचे जगणे सुरू आहे. आमचा गोसे प्रकल्प पूर्ण झाला नाही. प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या पैशांत काहींनी शेती घेतली. काही नागपुरात येवून बसले. अनेक हौसे श्रीमंत गावात आले. पाच लाख नाही, त्यापेक्षा अधिक पैसा देवून शेती सुरू केली. ख-या शेतक-याला लाजवेल, अशी शेती. पैसा आहे. फार्म हाउस बांधू लागले. शेतात एक नव्हे तर दोन विहिरी बांधल्या. दोन महिन्यात त्यांच्या शेतावर वीज आली. पंप सुरू झाले. ग्रीन नेट, घर दिसू लागले. गेली पन्नास वर्षे शेती करणा-या शेतक-यांच्या शेतात विजेचा खांब नाही. विहिरी झाली तरी, त्या विहिरीवर पंप नाही. कारण डिमांड भरायला पैसे नाहीत. विजेचा खांब ज्यांच्या शेतावरून गेला तो शेतकरी यावर्षी डिमांड भरून वीज घेतो म्हणून सांगत आहे. वीज वितरण कंपनीचा अधिकारी त्यांचा अर्ज गेल्या पाच वर्षांपासून फेकून देत आहे. पुन्हा अर्ज करा म्हणून सांगत आहे. खरा शेतकरी कोण आणि पैशावर झालेला शेतकरी कोण, अशी मोठी दरी ग्रामीण भागात होत आहे. एका शेतक-याच्या शेतात ग्रीन नेट आहे. त्या नेट खाली कोबी, टमाटर पीक आले आहे. त्याच्याच शेजारी दुसरा शेतकरी आहे. त्याच्या शेतात पाणी नाही. शेत भकास झाली. शेतात हिरवा रंगाचा एक शेला नाही. पीक कोठून येणार. यामुळे शेती फायदेशीर झाली आहे. शेतकरी मात्र, तोट्‌यात आहे. शेतकरी देशोधडीला लागला. कुठे हाक ना कुठे बोंब. म्हणून शेतकरी मेला आहे. 
चंद्रशेखर महाजन
9850209710

No comments:

Post a Comment